स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अभियानामध्ये अमृत कलश घेऊन पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या अमृत कलश यात्रेचे स्वागत आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा शेखर सिंह यांनी केले. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनासमोर झालेल्या या सोहळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, उपआयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यालय अधिक्षक रवी भाट, माजी नगरसेवक माऊली थोरात, सामाजिक कार्यकर्ते प्रा. बी.बी. शिंदे यांच्यासह रथा समवेत असलेले पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणचे समन्वयक उपस्थित होते. हा अमृत कलश मुंबई येथून दिल्लीकडे नेण्यात येणार आहे. देशाचे प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीत दिल्ली येथे दिमाखदार समारंभ पार पडणार आहे.पुणे जिल्ह्यातील विविध शहरांचे प्रतिनिधी अमृत कलश घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले. महापालिकेच्या वतीने कर्मचारी शिवाजी टिळे आणि मोहित भोसले प्रतिनिधित्व करीत असून ते या रथामध्ये सहभागी झाले आहेत. पुणे जिल्हा परिषद व नगरपालिका प्रशासन, पुणे यांनी अमृत कलश यात्रेच्या समन्वयाची जबाबदारी पार पाडली आहे. आज सकाळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथून जिल्ह्यातील प्रतिनिधींना घेऊन विशेष बस वाहनातून अमृत कलश यात्रेच्या प्रवासाचा प्रारंभ झाला. ही यात्रा पिंपरी चिंचवड शहरात आल्यानंतर मोठ्या उत्साहात तिचे स्वागत करण्यात आले.






